१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ……….. हे होत.
(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम
(ब) विल्यम जोन्स
(क) जॉन मार्शल
(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
उत्तर – (अ) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते.
स्पष्टीकरण:
विसाव्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले.
(२) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ………. यांनी केला.
(अ) जेम्स मिल
(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(ड) जॉन मार्शल
उत्तर – (ब) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला.
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) हू वेअर द शूद्राज – वंचितांचा इतिहास
(२) स्त्रीपुरुष तुलना – स्त्रीवादी लेखन
(३) द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 – मार्क्सवादी इतिहास
(४) ग्रँड डफ – वसाहतवादी इतिहास
उत्तर – द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ – मार्क्सवादी इतिहास
दुरुस्त केलेली योग्य जोडी: द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स: १८५७ – राष्ट्रवादी इतिहास
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
उत्तर 1 –
1. इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले.
2. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.
3. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच. त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
उत्तर 2 –
१. एकोणिसाव्या-विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणपद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या इतिहासकारांनी प्राचीन भारतीय वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्यासाठी केलेल्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हटले जाते.
२. महाराष्ट्रामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ब्रिटिश अधिकार्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध केला.
३. यापासून प्रेरणा घेऊन न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडणारा ‘द राईज ऑफ द मराठा पॉवर’ या ग्रंथाची निर्मिती केली.
४. यामुळे, दक्षिण भारताच्या प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.
यावरून असे म्हणता येईल, की राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावातून प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
(२) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
उत्तर 1 –
1. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.
2. बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. तसेच थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील घरांची वर्णन असतात.
3. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून ‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
उत्तर 2 –
१. ‘बखर’ हा एक ऐतिहासिक साहित्य प्रकार असून यात शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयींचे वर्णन केलेले आढळते.
२. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंगवर्णनपर, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक व राजनीतिपर असे प्रकार असून यातून आपल्याला राजे-महाराजे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळते.
उदा. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीविषयक ‘सभासद बखर’, पानिपतच्या युद्धाविषयीची ‘भाऊसाहेबांची बखर’, तसेच होळकरांचे घराणे व त्यांच्या योगदानाची माहिती देणारी ‘होळकरांची कैफियत’ ही बखर.
यावरून राजांची चरित्रे व त्यांची कारकीर्द यांच्या अभ्यासासाठी बखर हा महत्त्वाचा संदर्भ असल्याने तो ऐतिहासिक साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे असे म्हणता येते.
३. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?
उत्तर 1 – स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात ‘मार्क्सवादी इतिहासलेखन’ हा एक प्रमुख प्रवाह आहे.
1. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला ‘मार्क्सवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.
2. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
3. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो. याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे.
4. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहासलेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो.
उत्तर 2 – प्रस्तावना: स्वातंत्र्योत्तरकाळातील इतिहासलेखनातील नवीन वैचारिक प्रवाहापैकी मार्क्सवादी इतिहासलेखन हा एक वैचारिक प्रवाह आहे.
१. मार्क्सवादी इतिहासलेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मार्क्सवादी इतिहासलेखनामध्ये केंद्रस्थानी असतो.
२. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्त्वाचे सूत्र आहे.
३. मार्क्सवादी इतिहासकारांनी समाजातील जातिव्यवस्था, होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला असून यामध्ये दामोदर कोसंबी, कॉमे्रड डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
४. कॉम्रेड डांगे यांचे ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी’ हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.
निष्कर्ष: अशाप्रकारे, मार्क्सवादी इतिहासलेखनाद्वारे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करण्यात आले.
(२) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर 1 – भाषाशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र आणि इतिहासलेखन यांत मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे-
1. राजवाडे यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले.
2. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार मांडला.
3. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हे, असे त्यांचे मत होते.
4. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.
5. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.
6. स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहासलेखनाला दिलेले मोठे योगदान आहे.
उत्तर 2 – प्रस्तावना: वि. का. राजवाडे यांनी इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी विषयांवर मूलभूत संशोधन करून, मराठी भाषेतून इतिहासलेखन केले.
१. राजवाडे यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. तसेच, आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे या विचाराचा पुरस्कार केला.
२. राजवाडे यांनी मांडलेले महत्त्वपूर्ण विचार:
अ. ’इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती नव्हेत“.
ब. ’मानवी इतिहास हा काल व स्थल यांनी बद्ध झालेला असून काल, स्थल आणि व्यक्ती यांची सांगड म्हणजे ऐतिहासिक प्रसंग होय.“
३. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा राजवाडे यांचा आग्रह होता. इतिहाससंशोधनाच्या कार्याकरता त्यांनी ७ जुलै १९१० रोजी पुणे येथे ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ स्थापन केले.
निष्कर्ष: अशारीतीने, राष्ट्रवादी इतिहासलेखनाद्वारे वि. का. राजवाडे यांनी इतिहासाच्या अभ्यासाला तात्त्विक बैठक मिळवून दिली.
४. (अ) पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँड डफ | ______ |
______ | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे | ______ |
______ | हू वेअर द शूद्राज |
उत्तर –
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँड डफ | ए हिस्टरी ऑफ द मराठाज् |
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे | प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | हू वेअर द शूद्राज |
(ब) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर –
इतिहासलेखनाचा हेतू | बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने | काश्मीरचा इतिहास | छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती |
झियाउद्दीन बरनी | बाबर | कल्हण | कृष्णाजी अनंत सभासद |
तारीख-इ- फिरुजशाही | तुझुक-इ-बाबरी | राजतरंगिणी | सभासद बखर |
५. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) प्राच्यवादी इतिहासलेखन.
उत्तर –
1. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना ‘प्राच्यवादी अभ्यासक’ असे म्हणतात.
2. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले.
3. या लेखनाला ‘प्राच्यवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.
4. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून ‘या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली.
5. या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांना पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
(२) राष्ट्रवादी इतिहासलेखन.
उत्तर –
1. एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली.आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास ‘राष्ट्रवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.
2. या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला.
3. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.
4. राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
(३) वंचितांचा इतिहास.
उत्तर –
1. समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले; अशा समूहांच्या इतिहासाला ‘वंचितांचा इतिहास’असे म्हणतात.
2. मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.
3. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.
4. भारतात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले.
Khushi Singh says
It is very useful thanks 😊 👍 🙏
Aditi says
Where is next chapter
Sakshat says
Wavvvvv☠️☠️